श्रीश्रीश्री महामंडलेश्वर बाबा कालिदास महाराज यांच्या आशीर्वचनाने सूर्यदत्त संस्था लवकरच विद्यापीठ होईल : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त संस्थेतर्फे बाबा कालिदास महाराज यांना ‘सूर्यरत्न-द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया २०२५, सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’

पुणे: “शिक्षणाने जीवनातील अंधःकार दूर होतो. स्वतःचा, राष्ट्राचा व समाजाचा विकास होतो. त्यामुळे युवापिढीने संस्कारक्षम शिक्षण घेऊन नशामुक्त जीवनाचा अंगीकार करावा. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’ याचे पालन करावे. भारताची संस्कृती, नीती, कला, साहित्य परंपरा महान आहे. भारताची विश्वगुरू अशी ओळख कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे,” असे प्रतिपादन सांपला धामचे श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस कृष्णानंद बाबा कालिदास महाराज यांनी केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये बाबा कालिदास महाराज यांनी आशीर्वचनपर भेट देऊन विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला व मार्गदर्शन केले. याप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या हस्ते बाबा कालिदास महाराज यांना ‘सूर्यरत्न द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया २०२५, सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, शिवमूर्ती देऊन बाबा कालिदास महाराज यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी विश्वहिंदू सनातन धर्मरक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, रेल्वे मंत्रालय व दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार डॉ. आदित्य पतिकराव, मठाधिपती गुरुवर्य प्रकाश शिंदे, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डिजिटल स्ट्रॅटेजिक ऍडव्हायझर सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, नरेंद्र कुलकर्णी, राजीव श्रीवास्तव, प्रशांत पितालिया, शीतल फडके, प्राचार्य सिमी रेठरेकर, संजय मनियार, किरण राव, वंदना पांडे, हेमंत जैन, रोहित संचेती, मोनिका सेहरावत, स्वप्नाली कोगजे, नयना गोडांबे, बाटू पाटील, सामाजिक कार्यकर्ते पौर्णिमा लुनावत व शशिकांत कांबळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व बावधन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा कालिदास महाराज म्हणाले, “सूर्यदत्त शिक्षण संस्थेत संजय व सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वात संस्कारांचे, मूल्यांचे शिक्षण दिले जात आहे. परमात्म्यावर श्रद्धा असलेले हे दाम्पत्य आहे. विद्यार्थ्यांप्रती आस्था, समर्पण असलेली ही संस्था आहे. ही संस्था केवळ पैसे कमवण्याचे साधन नाही, तर संस्कारी पिढी घडवण्याचे धर्ममंदिर आहे. युवापिढीने शांती, समृद्धी, भाईचारा, एकात्मता जपण्याचे संस्कार घ्यावेत. भारत हा शांतताप्रिय देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेतृत्व मिळाल्याने भारताच्या प्रगतीची वाटचाल गतिमान राहील. आज येथे सूर्यदत्त संस्थेच्या वतीने मला सन्मानित करण्यात आले, याचा आनंद आहे.”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “महामंडलेश्वर बाबा कालिदास महाराज यांचा चरणस्पर्श संस्थेला झाला. त्यांचा आशीर्वाद व विद्यार्थ्यांना आशीर्वचन लाभले. हा क्षण भारावून टाकणारा आहे. सूर्यदत्त संस्था लवकरच विद्यापीठ होईल, असा आशीर्वाद त्यांनी दिला. शिक्षणाचे महत्व विशद करून त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारांचे, सर्वांगीण विकासाचे शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन केले. याच तत्वावर सूर्यदत्त संस्था स्थापनेपासून कार्यरत आहे. लवकरच सूर्यदत्त संस्थेच्या विद्यापीठाच्या पायाभरणीसाठी त्यांना निमंत्रित करण्यासाठी जाणार आहोत. त्यांच्या सानिध्यात काही वेळ घालवता आला, यामुळे आम्ही सर्वच धन्य झालो आहोत.”

कीर्तनकार श्वेता राठोड कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले. बाबा कालिदास महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते उपस्थितांना प्रसाद देण्यात आला.

Leave a Comment